ग्रामपंचायत माहिती : निधी, सदस्य मानधन, नवीन GR, पात्रता, कर्मचारी माहिती, योजना | Gram Panchayat Information In Marathi

ग्रामपंचायत माहिती : नमस्कार मित्रांनो, ग्राम पंचायत हा एक अतिशय सखोल जाणून घेण्यासारखा विषय आहे. महाराष्टात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. प्राथमिक स्तरावरील संस्था “ग्रामपंचायत” ही त्रिस्तरीय पंचायती राजातील सर्वात महत्वाची संस्था असल्याचे मानले जाते. म्हणूनच आजच्या या पोस्ट मध्ये ग्रामपंचायत बद्दल अगदी सविस्तर माहिती आम्ही कव्हर केलेली आहे. ग्रामपंचायत म्हणजे काय?, सदस्य , पात्रता, निधी, वेतन इत्यादी. अशा सर्व गोष्टी आम्ही सविस्तर सांगण्याचा प्रयत्न यता पोस्ट च्या माध्यमातून केलेला आहे.


चला तर सुरु करूया, Gram Panchayat Information In Marathi

ग्राम पंचायतीचा थोडक्यात आढावा (Overview of the Gram Panchayat in Marathi)

ग्रामपंचायत म्हणजे काय? (What is Gram Panchayat In Marathi)

ग्रामपंचायत माहिती

७३ व्या घटनादुरुस्तीनुसार, प्राथमिक स्तरावरील संस्था म्हणजेच “ग्रामपंचायत” ही त्रिस्तरीय पंचायती राज मधील सर्वात महत्वाची संस्था आहे. ग्रामपंचायत ही निवडून आलेल्या प्रतिनिधींची एक अशी संस्था आहे ज्यांना जनतेला समोरासमोर उत्तर द्यावे लागते आणि बहुतेक क्रियाकलापांसाठी निर्णय घेण्यापूर्वी त्यांची संमती घ्यावी लागते.

भारताच्या पंचायती राज व्यवस्थेत, एक गाव किंवा लहान शहर अशा स्तरावर ग्रामपंचायत किंवा ग्रामसभा असते, जे भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य अंग असल्याचे मानले जाते. सरपंच हा ग्रामसभेचा सर्वोच्च निर्वाचित प्रतिनिधी असतो. प्राचीन काळापासून भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात पंचायतीला महत्त्वाचे स्थान आहे. सार्वजनिक जीवनातील प्रत्येक पैलू त्यावर चालत असतो.

ग्रामपंचायतीचे स्वरूप

ग्रामपंचायतीचे स्वरूप आपण समजून घेऊया. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? कि ग्रामपंचायत कशी बनते? किंवा यात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे? ग्रामपंचायतीचे क्षेत्र कशावरून ठरवले जाते? तर मित्रांनो, नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित करण्याचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना असतात.

एका ग्रामपंचायतीमध्ये एक किंवा अधिक गावे (महसूल गावे) असू शकतात. मुख्य व्यक्ती जसे कि सरपंच हे थेट संबंधित ग्रामपंचायतीच्या सर्व मतदारांद्वारे बहुमताच्या आधारावर निवडले जातात. शिवाय ग्रामपंचायतीचे सर्व प्रतिनिधी हे मतदारांद्वारे थेट बहुमताच्या आधारावर निवडले जातात.

एक प्रभाग म्हणजेच प्रादेशिक मतदारसंघ सुमारे पाचशे लोकसंख्येवर तयार होतो आणि प्रत्येक प्रभागातून एक ग्रामपंचायत सदस्य निवडला जातो. सर्व प्रभाग सदस्य बहुमताने आपापसातून उपप्रमुख निवडतात. प्रमुखही या मतामध्ये सहभागी होतात. सरपंच, उपसरपंच आणि सर्व प्रभाग सदस्य असे सगळे मिळून एक ग्रामपंचायत तयार होते. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून पुढील पाच वर्षांसाठी असतो.

ग्रामपंचायतीचे कार्य किंवा ग्राम पंचायत काय काम करते? (Functions Of Gram Panchayat In Marathi)

ग्रामपंचायतींचे मुख्य कार्य म्हणजे ग्रामविकासात सहकार्य करणे आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत निर्णय प्रक्रियेत सामान्य माणसाला सामील करणे. खालील कार्ये ग्रामपंचायतींना देण्यात आली आहेत :-

  • खादी, ग्राम आणि कुटीर उद्योग
  • ग्रामीण स्वच्छता आणि पर्यावरण
  • ग्रामीण घर बांधकाम
  • पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
  • रस्ता, इमारत, पूल, कल्व्हर्ट, जलमार्ग
  • गावात रस्ते बांधणे.
  • गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
  • दिवाबत्तीची सोय करणे.
  • जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
  • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
  • सांडपाण्याची व्यवस्था करणे.
  • शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे
  • शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
  • विद्युतीकरण आणि वितरण
  • अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत
  • सार्वजनिक वितरण व्यवस्था
  • सार्वजनिक मालमत्तेची देखभाल
  • बाजार आणि जत्रा
  • ग्रामीण वाचनालय आणि वाचन कक्ष
  • स्टॉल, कांजी घरे आणि हँडकार्ट स्टँडचे बांधकाम आणि देखभाल
  • कत्तलखान्यांचे बांधकाम आणि देखभाल
  • सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे इत्यादींची देखभाल.
  • सार्वजनिक ठिकाणी डस्टबिनची व्यवस्था
  • झोपड्या आणि शेडचे बांधकाम आणि नियंत्रण
  • सामान्य कामांतर्गत नियोजन आणि बजेट तयार करणे, अतिक्रमणे काढणे आणि पूर, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सामान्य जनतेला मदत पुरवणे, जेणेकरून गावाची आवश्यक सांख्यिकीय आकडेवारी सुरक्षित राहील.
  • धर्मशाळा, वसतिगृहे आणि तत्सम इतर संस्थांचे बांधकाम आणि देखभाल
  • प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण
  • प्रौढ आणि अनौपचारिक शिक्षण
  • सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  • महिला आणि बालकल्याण
  • दारिद्र्य निर्मूलन
  • दुर्बल घटकांचे विशेषत: अनुसूचित जाती आणि जमातींचे कल्याण
  • सामाजिक, सांस्कृतिक आणि खेळांना प्रोत्साहन
  • शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी सामाजिक कल्याण
  • संसाधन व्यवस्थापन आणि उत्पादन
  • ग्रामीण वस्ती आणि बांधकाम कार्य
  • मानवी क्षमता निर्माण कार्य
  • कृषी आणि कृषी विस्तार
  • सामाजिक आणि शेत वनीकरण, किरकोळ वन उत्पादन, इंधन आणि चारा
  • पशुसंवर्धन, दुग्ध उद्योग आणि कुक्कुटपालन
  • मत्स्यपालन

बैठका– ग्रामपंचायतीची प्रत्येक महिन्यास एक अशा वर्षातून बारा बैठका बोलावल्या जातात.

अर्थसंकल्प – येणाऱ्या वर्षाचा गावाच्या जमाखर्चाचा अंदाज बांधणे, म्हणजे अर्थसंकल्प करणे. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार विविध १२८ मार्गाने गावात निधी जमा केला जाऊ शकतो व त्याचा विनियोग करणारी ढोबळ मानाने मुख्यतः १२२ खाती शासनाने नमूद केलेली आहेत. त्या त्या मार्गाने व खात्यानुसार आर्थिक अंदाज बनवून तॊ ग्रामसभेतून मंजूर करून घ्यावा लागतो.

वरील सर्व कामे हि ग्रामपंचायत मध्ये येतात, शिवाय या सर्व कार्यांव्यतिरिक्त, पंचायत शासनाने वेळोवेळी दिलेली कामे सुद्धा पार पाडावी लागतात.

ग्रामपंचायत कायद्यातील कलमे

  • मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी.
  • ग्रामपंचायतीचे कार्य चालविण्यास गावातील लोक आपले प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाने निवडतील.
  • सदर सदस्यांचे मतदान हे प्रोढ व गुप्त मतदान पद्धतीने होईल.
  • आरक्षण :- अ) ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण जागा पैकी ५०% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
    ब) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.
    क) इतर मागासवर्गीय घटकामध्ये मोडणाऱ्यांसाठी लोकांकरीता २७ % जागा आरक्षित आहेत.
  • सद्स्यांची पात्रता :- १) तो गावातील ग्रामसभेचा सदस्य असावा.
    २) त्याचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
    ३) त्याने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
  • कृषी व पतपुरवठा क्षेत्रातील सहकार सोसायटीच्या अध्यक्षांना सहयोगी सदस्य म्हणून घेता येते. मात्र त्यास ग्रामपंचायतीची परवानगी लागते, आता ही पद्धत बंद झाली आहे.
  • मुदत – ग्रामपंचायतिची मुदत ५ वर्षांसाठी आहे. ग्रामपंचायत बरखास्तीनंतर ६ महिन्यात निवडणूक घेणे बंधनकारक आहे व कोणत्याही परीस्थित मुदतवाढ मिळत नाही. ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा करण्याचा अधिकार राज्यशासन आहे. जर निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी राजीनामा दिला तर पोटनिवडणूक घेण्याचा निर्देश किंवा बरखास्ती निर्णय राज्यशासन घेते. त्या संदर्भातील अहवाल जिल्ह्याधिकारी शासनाकडे पाठवितो.
  • डोंगरी भागातील लोकसंख्येस ३०० ते १५०० लोकसंख्येत सात सदस्य असतात.

ग्रामपंचायत निधी माहिती (Gram panchayat nidhi in marathi)

मग आता प्रश्न येतो तो निधीचा. केंद्र सरकार गावांना निधी पुरवते कि राज्य सरकार? बघा! संबंधित योजना हि जर राज्य सरकारची असेल तर संपूर्ण निधी राज्य सरकार देते आणि केंद्राच्या बऱ्यापैकी योजनांसाठी ६० टक्के निधी केंद्र सरकार देते तर उर्वरित ४० टक्के निधी राज्य सरकारला द्यावा लागतो.

आधी बघूया कि, ग्रामपंचायतीला निधी येण्यासाठी गावाचा बजेट कसा ठरतो?

मित्रांनो, प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्रामविकास समितीची एक बैठक बोलावली जाते. या बैठकीत गावाच्या आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण अशा वेगवेगळ्या विषयांवर सखोल चर्चा केली जाते. त्यानंतर या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे सध्या किती निधी उपलब्ध आहे? आणि सरकारकडून किती अपेक्षित आहे, यासंबंधीचं एक अंदाजपत्रक तयार केलं जातं. हे अंदाजपत्रक ३१ डिसेंबरपूर्वी पंचायत समितीला पाठवणं अनिवार्य असतं. पंचायत समिती हे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवत असते.

एक गोष्ट लक्षात घ्या की, एका गावासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर अशा सर्व मिळून ११४० योजना आहेत. मग आता कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची, हे ते गाव कोणत्या जिल्ह्यात येतं किंवा कोणत्या भौगोलिक क्षेत्रात येतं, यानुसार ठरतं.

ग्रामपंचायत सदस्य (Gram panchayat sadasya in Marathi)

ग्रामपंचायत सदस्य हा ग्रामसंस्था आणि ग्राम पंचायत यांच्यामधील अतिशय महत्वाचा भाग असतो. ग्रामपंचायत सदस्यामुळेच गावातील सर्व समस्या ग्राम संस्था समोर येतात किंवा गावासाठी उपयुक्त अशा लागणाऱ्या उपाय योजना सुचविण्याचे काम या ग्रामपंचायत सदस्यांमुळे पूर्ण होत असते. आपल्या प्रभागातील सर्व समस्या लोकांकडून जाणून घेऊन त्या ग्रामसंस्था समोर मांडणे त्याच्या निराकरणासाठी प्रयत्न करणे. हे सदस्यांचे मुख्य कार्य असते.

ग्रामपंचायत सदस्य पात्रता, त्याचे अधिकार, कर्तव्ये, मानधन या बद्दल आपण सवसितर जाणून घेऊया,

ग्रामपंचायत सदस्य पात्रता नियम | ग्रामपंचायत सदस्य शैक्षणिक पात्रता

ग्रामपंचायत सदस्य कोणालाही होता येत नाही. गावाचा विकासाचा कारभार हा एक ठराविक पात्रता असलेल्या व्यक्तींच्या हातात असावा यासाठी राज्य सरकारने काही अटी लावून दिलेल्या आहेत. चला तर बघूया ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नक्की काय अटी आहेत, (Gram Panchayat Member Eligibility Rules in Marathi)

  •  तो गावातील ग्रामसभेचा सदस्य असावा.
  • त्याचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
  • त्याने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
  • ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान सातवी पास असणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायत सदस्य अधिकार (Gram Panchayat Member Rights in Marathi)

ग्रामपंचायतीमध्ये जसे सरपंच आणि उपसरपंच महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यही महत्वाचे कार्य बजावत असतात. ग्रामपंचायत सदस्य होण्याकरता बरेच लोक कंबर कसताना आपण बघितलेच असेल. सदस्य होण्यासाठीची पात्रता आपण बघितली, आता नेमकं या ग्रामपंचायत सदस्यांकडे कोणते अधिकार असतात? हे जाणून घेऊया,

ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार पुढीलप्रमाणे –

  1. निवडणुकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या तारखेस एकाला सरपंच पदावर व दुसऱ्याला उपसरपंच पदावर निवडून देण्यासाठी प्रत्येक पदासाठी एक एक मत देणे.
  2. पंचायतीच्या बैठकीत स्वतःचा ठराव मांडणे.
  3. स्वतःच्या ठरावाच्या समर्थनार्थ बोलणे किंवा इतर कोणत्याही सदस्याच्या ठरावाच्या विरोधात स्वतःचे मत व्यक्त करणे आणि ठरावाच्या मंजूरीसाठी मतदान करणे किंवा विरोधात मतदान करणे किंवा तटस्थ राहणे.
  4. विनंती करणे आणि पंचायतीची कागदपत्रे पाहणे.
  5. पंचायतीच्या मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्या, पंचायतीच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या आणि पंचायतीच्या ठरावांची पूर्णपणे अंमलबजावणी न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करणे.
  6. पंचायतीसाठी काम करण्याची इच्छा नसल्यास सदस्यत्वाचा राजीनामा देणे.
  7. पंचायतीचे प्रशासन आणि सेवकांवर देखरेख ठेवणे.
  8. पंचायतीचे उत्पन्न आणि ग्राम निधीचा योग्य वापर केला जाईल याची खात्री करणे.
  9. जर निवडून आलेले सरपंच / उपसरपंच यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नसेल, तर त्याच्याविरोधात पंचायतीमध्ये अविश्वास ठराव मंजूर करावा आणि त्याला पदावरून काढून टाकणे.

ग्राम पंचायत सदस्याची कर्तव्ये (Duties of Gram Panchayat Member in Marathi)

  1. सर्व पंचायत सभांना उपस्थित रहाणे आणि सभांमध्ये चांगला भाग घेणे.
  2. जर काही कारणास्तव पंचायतीचे काम काही काळासाठी करता येत नसेल तर त्या कालावधीसाठी रजा अर्ज करावा आणि आगाऊ मंजूर करावा. (अशी रजा एका वेळी सहा महिन्यांपर्यंत उपलब्ध असते. अशा रजेच्या मंजुरीशिवाय सलग सहा महिने झालेल्या पंचायत सभांना गैरहजर राहिल्यास, त्याचे सदस्यत्व सहा महिन्यांच्या शेवटी रद्द केले जाते. पंचायत त्याला ठराव करून पुन्हा सदस्य बनवू शकत नाही.)
  3. सुट्टी न घेता सलग चार महिने परगावी गेलेल्या व्यक्तीचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. दोन्ही प्रकरणांमध्ये हे पद रिक्त झाले आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना असतो. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर निर्णयाच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत राज्य सरकारकडे अपील दाखल करावे लागते.
  4. पंचायतीपुढे तुमच्या प्रभागातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.
  5. पंचायत ठरावानुसार सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
  6. पदाधिकारी, सचिव आपले कर्तव्य बजावत नाहीत का, भ्रष्टाचार वगैरेवर बारीक लक्ष ठेवणे आणि अशी कोणतीही गोष्ट लक्षात आल्यास पंचायतीच्या बैठकीत त्वरित हा मुद्दा उपस्थित करणे.

ग्रामपंचायत सदस्याना मानधन किती असते?

ग्रामपंचायत सदस्यांना बैठकीत उपस्थित राहिल्याबद्दल प्रति २०० रुपये इतका प्रत्येक बैठकीसाठी ग्राम पंचायत निधीतून दिला जातो. आर्थिक वर्षातील फक्त १२ सदस्यांना सदस्य भत्ता मर्यादित असतो.

निष्कर्ष

मित्रानो आज आपण या पोस्ट मध्ये ग्रामपंचायत माहिती अगदी सविस्तर पाहिली. आशा करतो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास कंटनेत आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद !!!

Team 360Marathi,

Other Posts,

Leave a Comment

close