“दास रामाचा वाट पाहे सदना” | समर्थ रामदास स्वामी आणि शिवकालीन गणेशोत्सव संबंधित सुंदर माहिती

🚩 दास रामाचा वाट पाहे सदना 🚩

“वार्ता विघ्नाची” म्हणजे अफजल खान विजापूरहुन निघाला. सुखकर्ता दुःखहर्ता……ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. ह्या गणेशोत्वाला इ.स.२०२२ साली ३४६ वर्ष पूर्ण होतं आहेत.

समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!

 सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !!

  समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. गणपतीच्या विषयात ज्यांचे अज्ञानी विचार आहेत त्यांकरिता हा वक्रतुंड आहे.(ज्ञा .) लंबोदर सर्व चराचर सृष्टी तुझ्या उदरात आहे (ए. म.) श्री समर्थांचा गणपती हा सरळ सोंडेचा आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती. या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख  “वार्ता विघ्नाची” ह्या शब्दात आपणांस स्पष्ट आढळतो.

वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !

हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात  आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे.सुंदरमठ शिवथर घळ (रामदास पठार) ही दासबोधाची जन्मभूमी आहे.  शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली. त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो

समर्थ रामदास स्वामी आणि शिवकालीन गणेशोत्सव संबंधित सुंदर माहिती

समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!

आकारा आकरी खंडी कोठी पाठविली ! हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया !!

११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे …

दास रामाचा वाट पाहे सदना !  संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!

छत्रपती शिवाजी राजांनी दक्षिण दिग्विजयाला जाण्यापूर्वी  जेव्हा समर्थाना  भेट दिली तेव्हा १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे आणि एक पांढरा घोडा अर्पण केले .त्यातील  फक्त घोडा ठेऊन इतर  अठरा शस्त्रे समर्थानी महाराजांना परत केली अशी नोंद ऐतिहासिक पत्रात मिळते. गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे, कल्याणस्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.

आज महाराष्ट्रात ऐतिहासिक  सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. ह्या  उत्सवाची प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई  गुरुकुल येथे २००९ ला  गणेशोत्सव  सुरू केला. व २०१० ला  सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू  झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय,पक्ष ,संघटना यांच्याशी नसून ऐतिहासिक घटनांवर आधारित आहे

रामदास पठार – सुंदरमठावर येण्याकरीता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरी जवळ कमानी खालून डाव्या हाताने सरळ पुढे ५ कि.मी. मठाच्या माळावर शेवट पर्यंत डांबरी रस्त्याने यावे.निवास, भोजन व्यवस्था विनामूल्य होऊ शकते. हे ठिकाण कोकणात महाड तालुक्यात असून  येथूनच  कोकणातील  गणेशोत्सवाला बहर आला आहे.

आपला नम्र,
महेश कदम.

Leave a Comment

close